कीर्तनवाडीत ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषण !

 

पाथर्डी - मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसी मधून आरक्षण देऊ नये व सगेसोयरेचा अध्यादेशास आमचा विरोध आहे म्हणून शासनाने  ओबीसी बांधवांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी भगवानगडाच्या पायथ्याला किर्तनवाडी येथे प्रल्हाद कीर्तने यांनी १४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषण स्थळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत.

गेल्या सहा दिवसापासून कीर्तने यांचे आमरण उपोषण चालू असून उपोषणास पाठिंबा देण्यासाठी परिसरातील,तालुक्यातील,शेजारील बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील अनेक ओबीसी बांधव दाखल होत आहेत. किर्तन वाडी येथे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनात आज तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. यामध्ये समता परिषदेचे ज्येष्ठ नेते रमेश गोरे, आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, ओबीसी महासंघाचे निमंत्रक दिलीप खेडकर आदींसह विविध कार्यकर्ते व तरुण  मंडळांनी कीर्तने यांची भेट घेऊन पाठिंबा देत आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली.

गेले सहा दिवसांपासून सुरू असलेल्या ओबीसींच्या या आंदोलनात शासन व प्रशासनाने दखल न घेतल्याने परिसरातील लोकांकडून संताप व्यक्त होत असून सर्व ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह विविध गावांमध्ये चक्री उपोषण करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे ग्रामस्थांनी जाहीर केले.   शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास पाथर्डी येथून आंदोलनाची व्याप्ती वाढवून संपूर्ण तालुक्यातील ओबीसी बांधव आपापल्या गावात आंदोलन करतील असे सांगून ओबीसी संघाचे नेते दिलीप खेडकर म्हणाले, गावागावात ओबीसी बांधवांची जनजागृती करून पक्षविरहित लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे. यासाठी आंदोलनाची दिशा येत्या दोन दिवसात स्पष्ट करण्यात येईल.

यावेळी बोलताना ओबीसी महासंघाचे निमंत्रक दिलीप खेडकर यांनी सांगितले कि स्वातंत्र्यपूर्व काळापासून ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. आता सुध्दा संविधानाची पायमल्ली करून शासन झुंडशाही समोर नमले आहे. मराठा आरक्षणासाठी रात्रीतून मसुदा तयार केला जातो. मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जात नाही. प्रशासकीय पद्धतीतील सर्व टप्पे बाजूला ठेवत मागण्या मान्य करण्याने प्रशासनावरील विश्वास सुद्धा लोकांकडून ऊडत चालला आहे. सर्व समाजाला समानतेची वागणूक शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा आहे. शासनाकडून होणाऱ्या दुजाभावास  आमचा विरोध आहे. ओबीसी आरक्षणा मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी चालू असलेल्या लढ्याला महासंघाने संपूर्ण पाठिंबा असल्याचे खेडकर यांनी सांगितले.

  • मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी कीर्तनवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे सकाळी ९ वाजता लाखो ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी निर्णायक जन आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. या आंदोलन ठिकाणी समस्त ओबीसी बांधवांनी आपल्या न्याय आरक्षण हक्काच्या लढाईसाठी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात येत आहे.

कीर्तनवाडी येथे आरक्षण बचावासाठी ओबीसी योद्धा प्रल्हाद कीर्तने यांचे १४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू असून सरकारने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड हे म्हणाले कि शासनाने दबावामध्ये घेतलेला निर्णय मागे घेण्यास भाग पाडू,घटनेतील मार्गदर्शक तत्वे कायदे याला बाजूला सरक केवळ सामाजिक दबावा पुढे झुकून चुकीचे निर्णय शासनाकडून होत असतील तर यामध्ये सामाजिक तणावास शासन सुद्धा जबाबदार धरले जाऊ शकते. ओबीसी समाजावर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही शासनाने ओबीसी बांधवावर अन्याय केला तर मतपेटी मधून यास उत्तर दिले जाईल असे आव्हाड यांनी सांगितले.

यावेळी भालगाव च्या माजी सरपंच मनोरमा खेडकर,भारजवाडी चे सरपंच माणिक बटुळे, बाळासाहेब बटुळे, भगवान हजारे, वामन कीर्तने, महारुद्र कीर्तने, कालिदास पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. खरवंडी कासारचा परिसर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्याला व भगवानगडाच्या बाजूने शेवगाव तालुक्याला लागून असून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे प्रभावक्षेत्र असलेला हा संपूर्ण परिसर आहे. सर्व ओबीसी समाजाचे प्रतिनिधी कीर्तन वाडी येथे भेट देऊन सक्रिय सहभाग व्यक्त करत आहेत. कीर्तन वाडी हे गाव कल्याण - विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर भगवानगड फाट्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर महामार्गावर आहे. त्या गावापासून महामार्गावरच सुमारे दहा किलोमीटर अंतरावर मराठा नेते मनोज जरांगे यांचे मातोरी हे मुळ गाव आहे.

यावेळी माहिती देताना प्रल्हाद कीर्तने म्हणाले मराठा समाजाच्या गरीब लेकरांना शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यास विरोध नाही परंतु ओबीसी मधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजास देऊ नये यामुळे ओबीसींचे आणि ओबीसींच्या लेकरांच्या पुढील पिढ्या बरबाद होतील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात येईल त्यासाठी आपण बेमुदत उपोषण करीत आहोत.

ऊस तोडणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी बाळासाहेब बटूळे म्हणाले कि ओबीसीच्या हक्कासाठीचे आंदोलन प्रल्हाद कीर्तने यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून गेल्या पाच-सहा दिवसांपासून उपोषण सुरू असूनही प्रशासनाने कसली दखल घेतली नाही पाथर्डीला तहसीलदार नाही ्रांताधिकार्‍यांना यायला वेळ नाही प्रल्हाद कीर्तने यांची प्रकृती खालावत असून सरकारी अधिकारी कर्मचारी अजून पर्यंत उपोषणाची दखलना घेतल्याने शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना येणाऱ्या काळात ओबीसींच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा कीर्तन वाडी गावातील गावकऱ्यांनी दिला.


Post a Comment

0 Comments