शंकर महाराज भक्तनिवास,महाप्रसाद गृहाचे भूमिपूजन !


पाथर्डी -  शंकर महाराज भक्ती मठात राज्यातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता भाविकांच्या योगदानातून भक्तनिवास व महाप्रसाद गृहाचे भूमिपूजन संत महंतांच्या हस्ते संपन्न झाले. यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षात काम पूर्ण करण्याचा निर्धार गावोगावच्या भाविकांनी व्यक्त केला. अशी माहिती शंकर महाराज मठाचे मठाधिपती माधव बाबा यांनी दिली.

यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, तारकेश्वर गडांचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, मोहन महाराज सुडके, स्वप्निल देशमुख, महेश बोरुडे, रामनाथ बंग आदींसह विविध कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आमदार मोनिका राजळे व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांनी कार्यकर्त्यांसह येत दर्शन घेतले. गेल्या बारा वर्षापासून सिद्ध संत माधवबाबा यांनी पाथर्डीतील अनेक साधकांना भक्ती मार्ग दाखवून शंकर महाराज यांच्या सेवाकार्याचे मोठे कार्य हाती घेतले. शहरातील कसबा विभागात मठ उभारून तेथून सेवाकार्य सुरू झाले.  पुणे, मुंबई, कल्याण, संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, नगर, बीड अशा विविध जिल्ह्यातील भाविकांची वर्दळ वाढली. दर महिन्याच्या शुद्ध अष्टमीला भाविकांकडून महाप्रसाद भंडारा कार्यक्रम आयोजित होतो. वाचासिद्ध संत अशी माधव बाबांची ख्याती असल्याने उपासकांच्या संख्येत वाढ होत आहे.

अनेक भाविकांना काही काळ निवासाची इच्छा असते पण सुविधा नसल्याने अन्य भाविकांच्या निवासस्थानी थांबावे लागे. महाप्रसाद गृहासाठी स्वतंत्र विभाग करण्यात येणार असून मुख्य मठा शेजारीच भक्तनिवास होणार असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत माहिती देताना महंत माधव बाबा म्हणाले, पाथर्डीच्या मठाचे स्थान अत्यंत श्रेष्ठ दर्जाची व्हावे अशी शंकर महाराजांची इच्छा असून सेवा कार्याविषयी अनेक भाविकांना प्रेरणा मिळते. भक्तनिवासाचा योग सुद्धा शंकर महाराजांच्या इच्छेने जुळून आला असून शंकर महाराजांच्या भक्तांच्या वर्दळी मुळे पाथर्डी तालुक्याचे अर्थचक्र अधिक गतिमान होण्याचा दिवस दूर नाही. काही काळ शंकर महाराजांचे वास्तव वृद्धेश्वर, मढी येथे राहिले असून अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांना ते गुरुस्थानी मानतात. प्रत्यक्षात त्यांचा अवतार महादेवाचा असून दत्त संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी सर्वत्र उपासकांना धार्मिक व संस्कृतीचे शिक्षण दिले. मठाचे काम पूर्ण झाल्यावर तालुक्याच्या अध्यात्मिक वैभवात निश्चितच भर पडणार आहे.यावेळी प्राध्यापक गणेश देशमुख व सौ गीतांजली देशमुख यांच्या हस्ते महापूजा होऊन त्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

    

Post a Comment

0 Comments