रखडलेल्या कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गाचा दशक्रिया


पाथर्डी - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ (निर्मल नांदेड) महामार्गाचे काम रखडल्याने काम मार्गी लागावे यासाठी सनदशीर मार्गाने मुर्दाड व्यवस्थेचा व महामार्ग विभागाचा येत्या १९ ऑक्टोबर रोजी गांधीगिरी मार्गाने पाथर्डी येथे दशक्रिया विधी आंदोलन करत असलेल्या बाबत ईशारा देत काम तात्काळ मार्गी लावावे याबाबत तहसीलदार शाम वाडकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांना निवेदन दिले आहे.


सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुनील पाखरे,किसन आव्हाड,सोमनाथ बोरुडे,अविनाश टकले,आसाराम पालवे,बाळासाहेब पाखरे,रमेश शहाणे,भगवान गोल्हार,प्रदीप दहिफळे,अनिल बडे,अर्जुन देशमुख,प्रमोद काकडे,महादेव कीर्तने यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,निवेदक हे पाथर्डी तालुक्यातील सामाजिक चळवळीत काम करणारे नागरिक असून आम्ही पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ च्या रखडलेल्या कामाबाबत यापूर्वी देखील अनेक वेळा सनदशीर मार्गाने आंदोलन करून काम मार्गी लागावे यासाठी आवाज उठवलेला आहे परंतु राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने महामार्गाचे काम मार्गी लावलेले नाही.


निर्मल नांदेड राष्ट्रीय महामार्ग गेली वर्षांपासून ठेकेदाराने नूतनीकरणाच्या नावाखाली उखडून ठेवला असून त्यामुळे रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे गेल्या वर्षापासून या रस्त्यावर दैनंदिन भीषण अपघात होत असून आज पावतो या राष्ट्रीय महामार्गावर शेकडो अपघात होऊन अनेक प्रवासी मृत झालेले आहेत याशिवाय या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांना कायमचे अपंगत्व येऊन अनेक संसार उघड्यावर आलेले आहेत.सदरील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे पाथर्डी तालुक्यासह पूर्व महाराष्ट्राचा संपर्क तुटला असून त्यामुळे या परिसरातील हॉटेल,उद्योगधंदे व शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.येथील स्थानिक युवक रोजगार हिरावला गेल्याने शहराकडे स्थलांतरित होत असून पाथर्डी शहराला बकाल वस्तीचे स्वरूप आले आहे.


याशिवाय पाथर्डी तालुक्यात असणारे अनेक धार्मिक ठिकाणे जसे की,भगवानगड, मोहटादेवी,वृद्धेश्वर,मढी,तारखेश्वरगड व शेजारील तालुक्यात असणारे असणारे धार्मिक ठिकाण मायंबा,बोधेगाव येथील बन्नोमा,केदारेश्वर यासह अनेक देवस्थानाला येणाऱ्या भाविकांची रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे अडवणूक होत असून दैनंदिन अपघाताचा सामना करावा लागत आहे. यामुळे तालुक्यात येणारे पर्यटक व भाविक दुरावले असून परिसरातील धार्मिक ठिकाव उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे तालुक्यात तयार होणाऱ्या शेतातील कच्चामाल पुणे,मुंबई,नाशिक या ठिकाणी असणाऱ्या बाजारपेठेत वेळेत पोहोच करता येत नाही त्यामुळे शेतकरी नुकसानीचा सामना करत असून अहवाल दिल झाला आहे. याशिवाय मध्यमवर्गीय नागरिकांनी कामधंद्यासाठी प्रवासानिमित्त घेतलेल्या वाहनांची खराब महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर मोडतोड नुकसान होत असून मध्यमवर्गीय नागरिकात असंतोष पसरला आहे.पाथर्डी शहरातील व्यापारी वर्ग रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे अडचणीत सापडला असून इतर ठिकाणाहून येणारा ग्राहक वर्ग कायमचा दुरावला आहे.याशिवाय रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र सरकारची कोट्यावधी रुपये खर्च झाले असून प्रत्यक्षात मात्र राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात नाही.राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यासह पाथर्डी पालिका व प्रशासन या सर्व दूरव्यवस्थेकडे डोळेझाक करून कशाची वाट पाहत आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


आम्ही या स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक व एक सामाजिक जाणीव असलेले कार्यकर्ते म्हणून अतिशय खिन्न मनाने या निवेदनाद्वारे आपणास कळवू इच्छितो की आम्ही आता पर्यंत अनेक आंदोलने चळवळी रास्ता रोको इत्यादी स्वरूपाचे आंदोलने करून देखील निगरगट्ट प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना कुठल्याही स्वरूपाचा फरक पडत नसल्याने आम्ही हतबल व दुःखी झालो आहोत आम्हाला राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार आम्हाला आत्मक्लेष व दुःख व्यक्त करण्याचा हक्क व अधिकार आहे म्हणून आम्ही सनदशीर मार्गाने व कुठलाही कायदा न मोडता प्रशासनाला सहकार्य करून गांधीगिरी मार्गाने मुर्दाड राष्ट्रीय महामार्ग विभाग,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे बेजबाबदार ठेकेदार व या मतदारसंघाचे नाकर्ते लोकप्रतिनिधी यांचा निषेध म्हणून दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ रोजी वसंतराव नाईक चौक पाथर्डी या ठिकाणी रखडलेल्या व खड्ड्यात अडकलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा गांधीगिरी पद्धतीने विधिवत दशक्रिया विधी घालत आहोत.


सदरील आंदोलन करताना आम्ही शांततेच्या मार्गाने व प्रशासनाला सहकार्य होईल अशा पद्धतीने आत्मक्लेष करणार असून आंदोलनाची दखल घेऊन संबंधित विभागाला राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ मार्गी लागावे यासाठी योग्य तो पत्रव्यवहार व आदेश करावा अश्या मागणीचे निवेदन दिले असून निवेदनाची प्रत नितीनजी गडकरी,कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग,प्रांताधिकारी पाथर्डी,तहसीलदार,मुख्याधिकारी पाथर्डी पालिका,पोलीस निरीक्षक पाथर्डी यांना दिल्याचे प्रा सुनील पाखरे यांनी अधिराज्य सोबत बोलतांना सांगितले.

 

 

 

Post a Comment

0 Comments