नवीन दहिफळ ग्रामस्थांची दिवाळी रस्त्यावरच,मूलभूत मागण्यांसाठी ग्रामस्थ त्रस्त



शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील ग्रामस्थांनी सकाळी ८:३० वाजल्यापासून गावातील चौकात रस्त्यावर चुली पेटवून चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी केली. दुपारपर्यंत प्रशासनाचे अधिकारी यांनी दखल घेतली नाही.गावचे तलाठी ,ग्रामसेवक यांनी प्रशासनाशी फोनद्वारे संपर्क साधून संबंधित घटनेचे माहिती प्रशासनाला दिली असता प्रशासनाचे अधिकारी गावात दाखल झाले व त्यांनी गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ऐकून त्यावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की गेल्या कित्येक दिवसांपासून नविन दहिफळ ग्रामस्थ आपल्या विविध मूलभूत प्रश्नांसाठी शासनाची झगडत आहे. ग्रामस्थांनी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना यासंबंधी निवेदन दिले होते.नवीन दहिफळ (ढोरहिंगनी) या धरणग्रस्त पुनर्वशीत गावच्या दोन्ही शिव व चांदगाव दहिफळ शिवरस्ते तसेच काळे मळा पाणंद रस्ता त्वरित व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली होती.

नवीन दहिफळ गाव विकासापासून तसेच मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. ग्रामीण भागाचे रस्ते विकासाचे मुख्य केंद्रबिंदू असून आमच्या गावामध्ये वाड्यावस्त्यावर जाणारे रस्ते अतिशय खराब झालेले आहेत. वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन देखील अद्याप पर्यंत शासनाने संबंधित प्रश्न मार्गी लावले नाहीत यासाठी बाळासाहेब सदाशिव शिंदे तसेच गावचे उपसरपंच कचरू इसरवाडे व ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसापूर्वी खासदार सुजय विखे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांनाही निवेदन दिले होते मात्र त्यांच्याकडूनही काही एक निर्णय झाला नाही. चांदगाव ते दहिफळ शिवरस्त्यावर अद्याप पर्यंत कोणताही निधी आला नाही त्यामुळे त्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्यावरून बैलगाडीही जाऊ शकत नाही. धरणाचे बॅकवॉटर असल्यामुळे या गावामधे बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे सदरील गावामध्ये कांदे,पपई ,ऊस, केळी ,डाळिंब,इतर भाजीपाला ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात परंतु रस्त्या निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे शाळेच्या मुलांचे, अंगणवाडीतील बालकांचे ,पिकांच्या वाहतुकीचे व शेतातून कापसासारखे पीक जनावरांचा चारा यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. उसाचे पीक रस्त्या अभावी खूप उशिरा तोडले जातात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची उशिरा तोडणी झाल्यामुळे वजनात घट येऊन आर्थिक नुकसान होते.

अनेक वेळा राजकीय नेत्याला व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊनही आमदार व खासदारांना लेखी निवेदन व समस्या सांगूनही कोणीही अद्यापही दखल घेतलेली नाही. अनेक वृत्तपत्रांमधून अंगणवाडी बालके, शाळेच्या मुलांचे महिलांचे व चिखलात असलेल्या बैलगाडीचे फोटो सह समस्या व्यक्त केल्या तरी देखील याची शासनाने दखल घेतली नाही. याची भयंकर चीड व संताप महिलांनी व्यक्त केला आहे व नाईलाजाने गावकऱ्यांनी दिवाळी सण हा रस्त्यावर साजरा केला आहे.रस्त्याचा प्रश्न हा पुनर्वसन निधीतून सोडवावा अन्यथा आम्ही रस्त्यावर पाल ठोकून दिवाळी सण रस्त्यावर चुली पेटवून साजरी करू अशा मागणीचे निवेदन गावकऱ्यांनी प्रशासनाला दिले होते.मात्र प्रशासनाने याविषयी गावकऱ्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही व या बाबीचा संताप व्यक्त करत समस्त ग्रामस्थांनी अक्षरशः रस्त्यावर चुली पेटल्या व चटणी भाकर खाऊन दिवाळी सण साजरा केला. दुपारनंतर प्रशासनाचे काही अधिकारी उपस्थीत झाले व त्यांनी गावकऱ्यांच्या मागण्या ऐकून त्यावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले व प्रत्यक्षात रस्त्यांची पाहणी केली.यावेळी मोठ्या संख्यने ग्रामस्थ ,महिला व युवक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments