पाथर्डी - समाजासाठी निस्वार्थी भावनेने काम केल्यास समाज आपल्याकडे
आदरयुक्त भावनेने पाहतो,आपण समाज व निसर्गासाठी काहीतरी देणे लागतो ही भावना
प्रत्येकाने अंगीकारल्यास समाजात सकारात्मक बदल होण्यास वेळ लागत नाही,समाजसेवेसाठी दिवसाचे काही मिनिटे जरी
खर्च केली तरी त्यातून होणारे परिवर्तन खूप मोठे असते, समाजसेवेचे बीज प्रत्येक
विद्यार्थ्यामध्ये रुजविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते असे प्रतिपादन
महाराष्ट्र शासनाचे स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांनी केले.
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मढी येथील विशेष
हिवाळी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे तर व्यासपीठावर कानिफनाथ देवस्थान
ट्रस्टचे मा. अध्यक्ष आण्णासाहेब मरकड, मढीचे मा. सरपंच देविदास मरकड, पत्रकार अविनाश मंत्री, डॉ सुभाष शेकडे, एनएसएस विभागप्रमुख डॉ अरुण राख, प्रा. आनंद घोंगडे, प्रा. सुरेखा चेमटे, डॉ अभिमन्यू ढोरमारे आदी उपस्थित होते. आदिनाथ ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना
संबोधित करतांना आपण करत असलेल्या समाजोपयोगी कार्याचा लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर
मांडला. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात कोपरगाव शहर स्वच्छ करण्यापासून करून नंतर
त्यांनी नदी स्वच्छता मोहीम, जलसंधारण, झाडे लावणे व संवर्धन करणे यामध्येही
भरीव योगदान दिले. कोपरगाव येथील गोदावरी नदीपात्र ते मागील सलग १९७ आठवडे स्वच्छ
करत असून लोकांची नदी स्वच्छता ठेवण्याबद्दल मानसिकता तयार करत आहेत. मेगेसेसे
पुरस्कार विजेते जगविख्यात जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंग यांचा राजस्थान येथील नदी
पुनरुज्जीवन योजनेचा आदर्श घेऊन ते महाराष्ट्रातील नद्या स्वच्छ व पुनरुज्जीवित
करण्यासाठी पुढाकार घेत असून या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे.नदीला
आपण आईचा दर्जा देतो परंतु कृतीमध्ये आपण तिला आईचा दर्जा देत नाही ही खंत शेवटी त्यांनी
बोलून दाखवली. एनएसएसच्या माध्यमातून समाजसेवेची शपथ यावेळी त्यांनी
विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस विभागप्रमुख डॉ. अरुण राख, सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू ढोरमारे, पाहुण्यांचा परिचय डॉ. सुभाष शेकडे तर
आभार प्रा. आनंद घोंगडे यांनी मानले. यावेळी डॉ. बबन चौरे, डॉ. अशोक कानडे, ग्रंथपाल डॉ. किरण गुलदगड, प्रा. ब्रम्हानंद दराडे, डॉ. अजयकुमार पालवे, प्रा. विजय देशमुख उपस्थित होते.
0 Comments