उज्वल भवितव्यासाठी पुस्तकांशी मैत्री वाढवा - भागिनाथ बडे

पाथर्डी - शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी शोधक दृष्टिकोन ठेवून यशाचे शिखर गाठलेल्या थोर व्यक्तींचे आत्मचरित्र वाचावे. आई-वडिलांबरोबर आपल्या गुरूंचा आदर करावा. मोबाईलचा गरजेपुरताच वापर करत पुस्तकांशी मैत्री वाढवावी असे आवाहन आदर्श शिक्षक भागिनाथ बडे यांनी  केले.

श्री हरिहरेश्वर माध्यमिक विद्यालय तोंडोळी येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ निमित्त आयोजित कार्यक्रमात बडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद खाडे, संजय उगलमुगले, प्रकाश जाधव, अण्णासाहेब नाकाडे ,सखाराम ढवळे, विनोद थोरात, अनंत घायतडक, ज्योती मोराळे ,रंगनााथ कुऱ्हाडे, वाल्मीक सातपुते, बळीराम गिरमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना बडे म्हणाले, आयुष्यात पैशापेक्षा ज्ञानाला खूप मोठे महत्त्व आहे. आई-वडिलांनी व दहावीपर्यंत गुरुजनांनी दिलेली संस्काराची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. स्पर्धेच्या युगात माय भूमीत मिळालेली शिकवण तुम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. आपण समाजाचे देणे लागतो याची आठवण ठेवून प्रामाणिकपणे काम करा. सत्याचा मार्ग कधीही सोडू नका असे आवाहन बडे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले. मुख्याध्यापक प्रल्हाद खाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Post a Comment

0 Comments