भटक्यांची पंढरी मढी यात्रेची नियोजन बैठक !

पाथर्डी - भटक्यांची पंढरी व महाराष्ट्रातील सर्व अठरापगड जातीचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानच्या यात्रेच्या नियोजनासाठी मढी येथे पाथर्डी शेवगावचे नुतन प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक पार पडली.

फाल्गुन शुद्ध पोर्णिमा (होळी) ते चैत्र शुद्ध प्रतिपदा ( गुढीपाडवा) अशी सुमारे १५ दिवस ही यात्रा चालते. यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, मढी देवस्थानचे अध्यक्ष राधाकिसन मरकड, सचिव विमलताई मरकड, विश्वस्त डॉ.विलास मढीकर, शामराव मरकड, रवींद्र आरोळे, सरपंच संजय मरकड यांच्यासह बांधकाम, विज वितरण, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य,परिवहन अशा विविध विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, देवस्थानचे मानकरी आदी उपस्थित होते.

यंदा इतर वर्षीच्या तुलनेत भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता असून मागील यात्रा काळातील झालेल्या व्यवस्थेतील चुका व भाविकांच्या दृष्टीने झालेल्या गैरसोयी सुधारून यावर्षीची यात्रा मागील अनुभवाच्या आधारे निर्विघ्नपणे पार पाडू असा विश्वास व्यक्त करत नियोजनातील छोट्या छोट्या चुका मोठ्या घटनेस कारणीभूत ठरतात यासाठी देवस्थान, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी उपस्थित विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, विश्वस्त व ग्रामस्थ यांना केल्या.यंदा यात्राकाळात पशुहत्या बंदी, दारूबंदी यासारखे निर्णय घेण्यासाठी समाज प्रबोधन करण्याची गरज असल्याचे व यात्राकाळात सर्व प्रथा परंपरा यांचे पालन होणार असल्याने सर्वांनी सामंजस्याची व समन्वयाची भूमिका घेऊन वादविवाद टाळावेत व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार श्याम वाडकर यांनी केले. होळी, रंगपंचमी व फुलोरबाग या मुख्य व भाविकांच्या गर्दीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. समाजकंटक, चोर, खिसेकापू आदींपासुन भाविकांना त्रास होणार नाही यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवला जाईल असे आयोजन करण्यात आले आहे. असे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले.

२१ फेब्रुवारी ते २२ मार्च पर्यंत यात्रा कालावधीत राज्याच्या सर्व भागांसह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने मढी येथे दर्शनासाठी येतात. सर्व विश्वस्त व विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांसह नियोजन आराखड्याला लवकरच अंतिम रूप देण्यात येईल. यात्रा उत्सवानिमित्त मानाच्या काठ्या, निशान भेट, महापुजा, विविध समाजातील मानाच्या प्रथा, परंपरा असे विविध कार्यक्रम उत्सव कालावधीत होणार आहेत. मंदिर भाविकांसाठी यात्राकाळात पुर्णवेळ खुले असते. २१ फेब्रुवारी यात्रापर्वास सुरुवात होईल.यानंतर कळसाची डागडुजी, रंगरंगोटी, पुजापाठ करुन मंदिरावर कळस चढवला जातो. पोर्णिमेस गडावर मानाची होळी पेटवली जाते. यात्रेचा मुख्य दिवस रंगपंचमीला वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने आणलेल्या मानाच्या काठ्यांसह राज्यभरातील नाथपंथीय भक्त कळसाला काठी लावुन धार्मिक विधीसह आपली नवसपुर्ती करतात. यावेळी रेवड्यांची उधळण केली जाते. एकादशी व अमावस्या काळात फुलोरबाग यात्रा भरते. निशानप्रस्थान व निशान भेटी नंतर जलाभिषेक व नाथ समाधीस लेप लावणे हे धार्मिक कार्यक्रम पार पडतात व प्रतिपदेला महापुजा होऊन उत्सवाची सांगता होईल. भाविकांसाठी आरोग्य, पिण्याचे पाणी, निवास व पार्किंग व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे. आवश्यक ठिकाणी यात्रेवर सीसीटीव्ही द्वारे लक्ष राहणार असून साध्या वेशातील स्त्री पुरुष पोलिसांचा फिरता बंदोबस्त वाढवण्यात येऊन मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. भाविकांच्या संख्येनुसार जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. मागील यात्रा काळात आलेले अनुभव कथन करत सरपंच संजय मरकड यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा काळात विशेष सेवा दिली जाईल असे आश्वासन दिले.

नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे बांधकाम विभाग, राजमार्ग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आदींकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने सर्वच भाविकांचे विशेषता नाथ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.सामाजिक जाणिवेतून व सेवाभावी वृत्तीने सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी कार्य करावे. भाविकांच्या भावनेचा व श्रद्धेचा प्रत्येकाने आदर करावा.सर्व सेवा व कामे दर्जेदार असावीत असे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले.

 

 

Post a Comment

0 Comments