घन ओथंबून येती अन् रोजच हवेतच विरती हुलकावणी : तहानलेल्या बळीराजाला पावसाची प्रतीक्षा

राजेंद्र जैन (कडा) - आकाशात दाट ढगांची गर्दी, सुसाट्याचा वारा आणि पावसाचा थेंब पण नाही, सध्या असंच चित्र दिसत आहे. जून महिना संपला, मात्र वरुण राजाने हजेरी न लावली नाही. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत तहाणलेला बळीराजा अक्षरश: हवालदिल झाला, घन ओथंवून येती अन् हवेतच विरती...अशीच काहीशी परिस्थिती आष्टीकर अनुभवत आहे.                              

राज्यात मान्सुनने काही ठिकाणी दमदार हजेरी लावली असली तरी आष्टीकरांना पावसाने नेहमीप्रमाणे हुलकावणी दिल्याने शेतकरी वर्गाची झोपच उडाली आहे. या जून महिन्याच्या आठ तारखेस लागलेले मृग नक्षत्र पावसाअभावी कोरडेच गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, आष्टीकर आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जून महिना संपला असला तरी पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. एक महिन्यापूर्वीच शेतक-यांनी काक-या, पाळ्या घालून जमिनीची मशागत करुन ठेवली आहे. मात्र पावसाळा लागून महिना लोटला तरी अजूनही पावसाची हजेरी नाही. मृगाच्या पावसाने दगा दिल्याने चिंता वाढली आहे. कृषी विक्रेत्यांनी दुकानात माल साठवून ठेवला. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी बी- बियाणे खरेदी करण्याचे साहस करीत नाहीत. त्यामुळे दुकानदारही पैसे गुंतवून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पावसाची चिंता, बाजारपेठेत शुकशुकाट ...

दररोज आकाशात दाट ढगांची गर्दी, दुपारनंतर सुसाट्याचा वारा अन् पावसाचा थेंब नाही, जून महिना संपला, मात्र अद्याप पाऊस नाही. पाऊस नसल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत शुकशुकाट निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल देखील सध्या मंदावली असल्याचे व्यापारी योगेश भंडारी यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments