वैद्यकीय क्षेत्रात सद्भावना, सेवाभाव महत्वाचा- मा.आ. भिमराव धोंडे

 


कडा / वार्ताहर- रुग्णसेवा करीत असताना डाॅक्टरांमध्ये सद्भावना, सेवाभाव महत्वाचा असून, हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून डाॅ. अनिल मुरडे व डाॅ. माधवी मुरडे या दांम्पत्यांनी महिला आणि जेष्ठ नागरीकांना उपचारा दरम्यान वैद्यकीय सेवा शुल्कात पन्नास टक्के सवलत हा उपक्रम स्तुत्य असला तरी रुग्णांना सरकारी योजनांचा आरोग्य सोयी- सुविधांचा लाभ मिळवून दिल्यास सर्वसामान्य रुग्णांना त्याचा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन माजी आ. भिमराव धोंडे यांनी केले.

आष्टी तालुक्यातील कडा येथील डाॅ. अनिल मुरडे व डाॅ. माधवी मुरडे यांच्या मातोश्री हाॅस्पिटल संचलित सद्भावना सेवाभावी या दवाखान्याच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.याप्रसंगी हभप बबन महाराज बहिरवाल, हभप बाळकृष्ण बालवडकर, जयदत्त धस, प्रसिध्द कर्करोग तज्ञ डाॅ. सतिश सोनवणे, डाॅ. अशोक गांधी, डाॅ. सुभाषचंद्र वैद्य, डाॅ. पंडीतराव खिलारे, सभापती रमजान तांबोळी, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले, शंकर देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना धोंडे म्हणाले की, सध्या ताणतणाव, आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे विविध शारीरिक आजार वाढत आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. डाॅ. मुरडे या दांम्पत्यांनी मातोश्री हाॅस्पिटलच्या सद्भावना सेवाभावी दवाखान्याच्या माध्यमातून महिला आणि जेष्ठ नागरीकांना वैद्यकीय सेवा देताना शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्याचा उपक्रम रुग्णांसाठी स्तुत्य आहे. मात्र रुग्णांना सरकारी आरोग्य सोयीसुविधांचा लाभ मिळवून दिल्यास त्याचा फायदा होणार असल्याचे धोंडे म्हणाले. कोविडच्या काळात अनेकांना अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागले. मात्र अशावेळी डाॅ. अनिल मुरडे यांनी रुग्णांना मदतीचा दिलेला हात महत्वाचा असल्याचे गौरवोदगार जयदत्त धस यांनी काढले. तसेच दिवसेदिवस जीवनशैलीत बदल घडू लागल्याने दुर्दैवाने हृदयरोग, मधुमेह, कर्करोग यासारख्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यात कड्याला तज्ञ डाॅक्टरांची गरज पडणार असल्याचे सांगितले. तर नगरचे प्रसिध्द कर्करोग तज्ञ डाॅ सोनवणे म्हणाले की, कुठलाही आजार हा दुर्लक्ष केल्याने वाढत जात असतो, त्यासाठी वेळीच तज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरते. 

एकीकडे मानवाचे आयुष्यमान वाढत आहे, तर दुसरीकडे आजारांची संख्या वाढत आहे. कर्करोग हा पहिल्या किंवा दुस-या टप्प्यात असेल तर त्यावर नियंत्रण मिळवता येते. मात्र कर्करोगावर नियंत्रण मिळवायचे असल्यास जनजागृती पर्याय असून, त्याकरिता शाळा, महाविद्यालयातून व्यसन मुक्तीसाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी हभप बबन महाराज,डाॅ. पंडीतराव खिलारे, डाॅ. अशोक गांधी, सभापती रमजान तांबोळी, डाॅ. नदीम शेख, शंकर देशमुख, प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे, बाबुलाल भंडारी आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य विधाते, प्रा शाम सांगळे, डाॅ.उमेश गांधी, डाॅ प्रताप मार्कंडे, श्रीमती लक्ष्मीबाई मुरडे, प्रा. सुपर्णा देशमुख, सौ. अलका रायते, भाऊसाहेब राऊत, डाॅ युवराज तरटे, गोरख कर्डीले, डाॅ. बाळासाहेब गि-हे, पुरोहित पुरुर्षोत्तम जोशी, सुशिल पटवा, सचिन गुंदेचा, जयंत देशमुख, श्रीपाळ धुमाळ, कानिफ शिरगीरे, प्रफुल्ल भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना डाॅ अनिल मुरडे म्हणाले ग्रामीण भागातील रुग्णांना अल्पदरात आधुनिक वैद्यकीय सेवा देण्याचा मानस आहे. तसेच, मोबाईलच्या अति वापराने सध्या मानसिक आजार बळावत आहेत. त्यामुळे लवकरच सद्भावना फाउंडेशनच्या वतीने मोबाईल व्यसनमुक्ती व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिप्ती शुक्रे यांनी केले तर आभार मोहसीन पठाण यांनी मानले.


Post a Comment

0 Comments