आदिनाथ शास्त्री यांचे वारकरी संप्रदायासाठी अनमोल योगदान – आ. मोनिका राजळे

 

पाथर्डी   - तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांचे वारकरी संप्रदायासाठीचे व एकूणच सेवा कार्याचे योगदान पाहता राज्य शासनाने त्यांना शासन स्तरावरून सेवा कार्यात सहभागी करून घ्यावे, यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार मोनिका राजळे यांनी दिले.                 

तारकेश्वर गडाच्या दिंडीला यंदा राज्य शासनाचा निर्मळ दिंडी पुरस्कार मिळाल्याबद्दल वनदेव मॉर्निंग  ग्रुपच्या सांस्कृतिक कार्य समितीतर्फे माहेश्वरी राम मंदिरामध्ये विशेष सन्मानपत्र प्रदान व संत पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, ब्रह्म वृंदांचे प्रतिनिधी अमोल मुळे, बाळासाहेब शिरसागर, शंकर महाराज मठाचे संस्थापक माधव बाबा, मोहन सुडके महाराज, राम मंदिराचे पुरोहित तारे महाराज आदी उपस्थित होते.                     

यावेळी आमदार राजळे म्हणाल्या, धर्मसत्ता, राजसत्ता व प्रशासनाची सत्ता यांची भूमिका समाज कल्याणची असते. यामधील परस्पर समन्वय सेवा कार्याची अचूकता व शुद्धता अधिक परिणामकारकता  वाढवणारा ठरतो. तारकेश्वर गडावर वरून वैकुंठवासी नारायण महाराजांनंतर आदिनाथ शास्त्री महाराजांनी अत्यंत सेवाभाव ,अन्नदान , गोसेवा ,लोकप्रबोधन, कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून मोठी सेवा केली .त्यांच्या तपा चरणाच्या प्रभाव भाविकांना सहजपणे जाणवतो. भगवानगड तारकेश्वर गड ,गहिनीनाथ गड ,अशी प्रमुख धार्मिक स्थळे नाथ व वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा जपत आहेत. आदिनाथ शास्त्री महाराजांना मिळालेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार संपूर्ण राज्यातील वारकरी संप्रदायाचे महत्त्व वाढवणारा व कार्याची दखल घेणारा ठरला आहे. आदिनाथ महाराजांसारख्या संतांचे मार्गदर्शन राज्य शासनाला दिशादर्शक ठरणार आहे .असे राजळे म्हणाल्या.             

यावेळी बोलताना आदिनाथ शास्त्री म्हणाले , वनदेव मंडळाच्या माध्यमातून शहरात सेवा कार्याचा वर्ग वाढत आहे. राज्य शासनाचा निर्मळ दिंडी पुरस्कार मिळणे हे वै. नारायण महाराजांबरोबरच पांडुरंगाची कृपा आहे. आमदार मोनिका राजळे यांचे राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील कार्य संत परंपरेला साजेसे आहे. शांतता, संयम ,विकासाचा ध्यास व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य लोकांबरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध आध्यात्मिक उंची दर्शविणारे आहेत. वनदेव मंडळाकडून झालेला सन्मान कार्याला अधिक प्रेरक ठरणार आहे .या मंडळाच्या उपक्रमात आगामी काळात आपण पूर्णपणे सक्रिय राहून शहरातील सेवा कार्यात अधिकाधिक सहभाग नोंदवू .           

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मंत्री, स्वागत सुवर्णयुग मंडळाचे उपाध्यक्ष योगेश घोडके, सूत्रसंचालन कृष्णा रेपाळ, तर आभार संतोष जाधवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक मंत्री, गणेश पंडित, सुरेश इजारे, सतीश एडके, विठ्ठल मंत्री, किशोर पारखे ,अशोक देखणे, आनंद फासे, राजेंद्र एडके आधी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments