वधूवर सूचक मेळाव्याचे रविवारी आयोजन !

पाथर्डी - समाजात उच्च शिक्षित मुलींची संख्या वाढत असून शहरात जाण्याची ओढ, मोठा व्यवसाय, नोकरी या मुलींच्या अपेक्षेमुळे व या तुलनेत शेतकरी, कामगार व छोटे व्यावसायिक व ग्रामीण भागात अविवाहित मुलांची संख्या वाढत असुन यामधुन सामाजिक समतोल ढासळत जाऊन ही समस्या उग्र स्वरूप धारण करत आहे. त्यामुळे वधू-वर परिचय मेळावा ही आता काळाची गरज बनली आहे. प्रत्येक समाजात वधू-वर परिचय मेळावा होणे गरजेचे आहे. त्यामुळे लग्न जोडण्यास मदत होते व होणारा खर्चाची देखील बचत होते, असे प्रतिपादन विभागीय प्रदुषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांनी केले.

क्षत्रिय वंजारी एकता परिषद आयोजित वंजारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे, हभप.आजिनाथ महाराज आंधळे, पंचायत समितीचे माजी सदस्य भगवान आव्हाड, वसंतदादा विद्यालयाचे प्रा.महेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.

राज्यस्तरीय वंजारी समाजाचा वधु-वर परिचय मेळावा येत्या रविवारी (२४ डिसेंबर) रोजी पाथर्डी येथील विठोबा राजे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बोलताना पालवे म्हणाले की, क्षत्रिय वंजारी एकता परिषदेने या मेळाव्यासाठी पुढाकार घेतला असून या मेळाव्याचे यंदा पहीलेच वर्ष असून या प्रश्नाची दाहकता पाहता असे मेळावे नियमित होणे ही आता काळाची गरज बनली आहे. समाजात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी जाणवते‌. काही वर्षांपूर्वी स्त्री भूण हत्या, हुंडाप्रथा, सासरचा छळ, असुरक्षितता या कारणामुळे मुलींचा जन्मदर घटला. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षणाच्या गुणवत्तेचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव, नोकरी व रोजगाराची अल्प निर्मिती यामुळे बेरोजगारी वाढून अविवाहित मुलांची संख्या वाढत आहे. वधू वर परिचय संमेलनात कोणताही न्युनगंड बाळगता, सामाजिक भीड न बाळगता या प्रवाहात सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ्य टिकवणे साठी पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे. असे पालवे यांनी स्पष्ट केले. तर चांगल्या रूढी परंपरा कायम ठेवून अनिष्ट व कालबाह्य रूढी काढून वाडे भाऊ आदी प्रथा बंद कराव्यात अशी अपेक्षाही यावेळी आयोजकांनी व्यक्त केली. तसे ठराव या मेळाव्यात समाजासमोर मांडणार असल्याचे परिषदेच्या वतीने हभप आंधळे महाराज यांनी स्पष्ट केले.

वंजारी समाजाच्या परिचयाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आणि विवाहासारखा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मागील काही दिवसांपासून समाजाच्या सर्व घटकांसाठी एकत्रित वधु-वर परिचय मेळावा व्हावा यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. मेळाव्याच्या माध्यमातून उच्चशिक्षित अल्पशिक्षित, शहरी ग्रामीण गरीब श्रीमंत हे भेदभाव मिटून एका व्यासपीठावर विवाह जुळण्यासाठी प्रयत्न होतील अशी अपेक्षा ही आयोजकांनी यावेळी व्यक्त केली. भविष्यात सर्व माहिती संकलित करून संगणक प्रणाली विकसित करणार आहोत यामधून सर्व माहिती समाजाला मिळेल. या मेळाव्यातील सर्व सुविधा विनामूल्य असल्याने वधुवर, पालक, नातेवाईक यांनी रविवारी या मेळ्याव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परिषदेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

 

Post a Comment

0 Comments