ओबीसी योद्धा कीर्तने यांचे उपोषण सुटले !

पाथर्डी - ओबीसींच्या सामूहिक लढ्यामुळे १० टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले. आता उर्वरित लढा जिंकण्यासाठी ओबीसींचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाच्या पायथ्यापासून रणसिंग फुंकून आरक्षण हक्काचा लढा पूर्ण करावा लागेल यासाठी आपण लवकरच कार्यक्रम जाहीर करू अशी माहिती ओबीसी चळवळीचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली.

तालुक्यातील कीर्तन वाडी येथे गेल्या ११ दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कीर्तने यांनी मराठा आरक्षणातील सगेसोयरे बाबतचा अद्यादेश रद्द करावा. ओबीसींच्या टक्केवारीला धक्का लागू नये या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन केले. आमदार मोनिका राजळे यांनी शुक्रवारी दुपारी अचानक याठिकाणी भेट देत मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून देऊ नये अशी तुमची मागणी होती ती शासनाने मान्य केली आहे असे सांगितले. पाणी घेऊन उपोषण सोडण्याचे त्यांनी मान्य केले होते.  त्यानंतर राजकीय हालचाली वाढून कीर्तने यांनी आपण जलत्याग नव्हे तर अन्नत्याग आंदोलन केले आहे. त्यामुळे आपले उपोषण सुरूच असून सगे सोयरे बाबत अध्यादेश मागे घ्या अशी मागणी केली. आज मागणीमध्ये पुन्हा भर पडून आता सरसकट कुणबी दाखले देणे बंद करावे त्यामुळे ओबीसी वर अन्याय होतो अशी पुरवणी मागणी पुढे आली. आज प्रकाश शेंडगे उपोषण स्थळे येणार होते स्थानिक प्रशासनाकडे त्यांचा दौरा आला मात्र मराठा आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दौरा स्थगित करण्याची विनंती प्रशासनाने केली  

त्यामुळे आज ज्यूस व बिस्किट खाऊन सोडण्यात आले यावेळी माजी आयुक्त दिलीप खेडकर,माजी सरपंच डॉ मनोरमा खेडकर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माणिक खेडकर ज्येष्ठ नेते सुधाकर आव्हाड हभप अजिनाथ महाराज आंधळे,आम आदमीचे किसन आव्हाड, ओबीसी नेते रमेश गोरे आदींच्या उपस्थितीत विविध व त्यांनी भावना व्यक्त केल्या.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे व माजी आमदार लक्ष्मण गायकवाड यांनी व्हिडिओ कॉलवर कीर्तने यांच्याबरोबर चर्चा केली कीर्तने यांनी दोघांना भगवानगडावर भेट देण्याची विनंती केली यावेळी कीर्तने यांनी सांगितले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसी चळवळ भगवान गडावरून सुरू केली. त्याला प्रचंड यश मिळाले यामुळे ओबीसींचा पुढचा लढा आपण भगवान गडाचे आशीर्वाद घेऊन सुरू करू यासाठी आपण सर्वांनी भगवानगड परिसरात यावे अशी विनंती यावेळी कीर्तने यांनी केली.

यावेळी बोलताना दिलीप खेडकर म्हणाले की, उपोषण आंदोलन स्थगित झाले असून उद्यापासून साखळी उपोषण सुरू होईल, या आंदोलनात गावातील महिलांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय राहिला. यामध्ये राजकारण आणण्याची गरज नव्हती. कीर्तने यांना विविध बाजूने राजकीय फायद्यासाठी काही पुढार्यांनी उलटसुलट माहिती देवून आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासून आंदोलनात सहभागी असलेले कुणी उपस्थित नसताना, त्यांना निरोप न देता उपोषण सोडण्याच्या प्रयत्न झाला. मुंबईला आम्ही संबंधित मंत्री, नेते यांना भेटण्यासाठी गेलो, इकडे तुम्ही वेगळे वातावरण करणे योग्य नाही. ओबीसी चळवळ अशी संपणार नाही. असा इशारा खेडकर यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता दिला.

 

Post a Comment

0 Comments