बघ्यांची भूमिका घेणाऱ्या पोलीसाना धडक मोर्चाद्वारे जाब विचारू ! घुले

 

पाथर्डी - चोरी,घरफोडी,मारामारी,रस्ता लूट यासह आता गोळीबाराच्या देखील घटना पाथर्डी - शेवगाव सारख्या भागात घडत आहेत.बघ्यांची भूमिका घेणाऱ्या पोलीस प्रशासनाने गुन्हेगारावर कायद्याचा बडगा उभारावा.अन्यथा आम्हाला धडक मोर्चाद्वारे आपल्या कार्यालयात येऊन जाब विचारावा लागेल. असा इशारा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी दिला.

लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.क्षेत्र तारकेश्वर गड येथे महंत गुरुवर्य नारायण बाबा यांचे समाधीस्थळ आहे.मागील आठवड्यात येथील दानपेटीची चोरी झाली होती. यानंतर संशयित आरोपींनी गडावर येऊन दमबाजी केल्याची घटना घडली.या पार्श्वभूमीवर माजी आमदार.घुले यांनी गडावर जाऊन महंत आजिनाथ महाराज यांची भेट घेतली.यावेळी  राम महाराज झिजुर्के,बाळासाहेब ताठे,संजय चितळे यासह भाविक उपस्थीत होते.

                          पुढे बोलताना घुले म्हणाले की,पाथर्डी - शेवगाव तालुका हा नगर,बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे.यामुळे लगतच्या विविध जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पाथर्डी - शेवगाव परिसरामध्ये छोटे मोठे गुन्हे करताना दिसून येतात.मोठ्या शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील गोळीबार यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. यामुळे कोण कधी कुणाच्या जीवावर उठेल सांगता येत नाही.   शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गुन्हेगारी मुळे त्रस्त झालेले नागरिक कुठल्याही क्षणी आता रस्त्यावर उतरतील. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांचे विषयी राज्यात सर्वत्र प्रचंड आदराची भावना असून त्यांना कोणीही शत्रू असू शकत नाही.

संत,महंत, मंदिरे, सर्व प्रकारची धर्मस्थळे व श्रद्धेची स्थळे यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची आहे .राज्य शासनाने महंत आदिनाथ शास्त्री यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावे. त्यामुळे तेथे येणाऱ्या भाविकांना सुद्धा आपोआपच सुरक्षित वातावरण निर्माण होईल. तारकेश्वर गड म्हणजे या परिसराची ऊर्जा शक्ती असून तेथे जर असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित व  मालमत्तांचे रक्षण कोण करणार असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाने अंकुश आणावा.अन्यथा लगतच्या सर्व पोलीस स्टेशनवर एकाच वेळी मोर्चा काढून जाब विचारण्यात येईल.असा ईशारा घुले यांनी दिला.


Post a Comment

0 Comments